वाराणसी : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या २० व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातील बनौली गावातून कार्यक्रमाचे थेट प्रसारण झाले. यावेळी मोदींसोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते.
बारामती-शारदानगर येथील अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट येथे पी.एम.किसान सन्मान निधी वाटपाच्या कार्य़क्रमाच्या अनुषंगाने केंद्रीय सहकार व हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आले होते. यावेळी आयोजित शेतकऱी मेळाव्यात मंत्री मोहोळ बोलत होते. यावेळी उत्तरप्रदेश येथील वाराणसी येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाचे व्हरचुअल प्रक्षेपण उपस्थितांनी पाहिले.
या योजनेच्या २० व्या हप्त्यांतर्गत देशभरातील ९ कोटी ७० लाख ३३ हजार ५०२ शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २,००० रुपये, असे एकूण २०,५०० कोटी रुपये थेट जमा करण्यात आले. पंतप्रधान मोदी म्हणाले, “ कोणतेही मध्यस्थ, कोणतीही कट-कमिशनशिवाय ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचते, हीच या योजनेची खरी ताकद आहे.”
योजनेचा प्रवास : २०१९ ते २०२५
पीएम किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू करण्यात आली. मोदींच्या पहिल्या कार्यकाळात सुरू झालेली ही योजना आजपर्यंत २० हप्त्यांपर्यंत पोहोचली आहे.
-
१८ वा हप्ता : महाराष्ट्रातील वाशिम येथून वितरित – ₹२,०००
-
१९ वा हप्ता : बिहारमधील कार्यक्रमातून – ₹ २,००० (२४ फेब्रुवारी २०२५)
-
२० वा हप्ता : वाराणसी, उत्तर प्रदेश – ₹ २,००० ( २ ऑगस्ट २०२५)
एकूण लाभ
ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून योजना सुरु असल्यापासून पात्रता टिकवली आहे, त्यांना एकूण २० हप्त्यांमध्ये मिळून ४०, ००० रुपये मिळाले आहेत.
योजनेची वैशिष्ट्ये :
-
एका वर्षात ₹ ६,००० आर्थिक मदत
-
ती रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये ( प्रत्येकी ₹ २,०००) थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
-
कोणताही दलाल किंवा कमिशनशिवाय डिजिटल पद्धतीने वितरण
पात्रतेच्या अटी :
-
शेतकरी भारतीय नागरिक असावा
-
त्याच्या नावावर शेती असावी
-
छोटे व अल्पभूधारक शेतकरी पात्र
-
वार्षिक पेन्शन ₹ १०,००० पेक्षा कमी असावी
-
शेतकरी आयकर दाता नसावा
नवीन नोंदणी कशी करावी ?
कोणत्याही पात्र शेतकऱ्याला योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास, खालीलप्रमाणे प्रक्रिया आहे:
-
pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
-
“New Farmer Registration” वर क्लिक करा
-
आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरा
-
“Yes” वर क्लिक करा आणि फॉर्म पूर्ण भरून सबमिट करा
शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी केंद्र सरकारचा मोठा पाऊल ठरणारी ही योजना, आता २० व्या टप्प्यावर आली असून, डिजिटल भारताचं यशस्वी उदाहरण म्हणून तिचं कौतुक होत आहे.
—————————————————————————————————






