संपादकीय….✍️
०७ मे २०२५ रोजी भारत सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाक-स्थापित काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ले केले. हे हल्ले २२ एप्रिलला पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात होते, ज्यात २६ हिंदू पर्यटकांचा मृत्यू झाला होता. भारताने स्पष्ट केले की, कारवाई केवळ लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या दहशतवादी संघटनांच्या तळांवर केंद्रीत होती.
ही कारवाई केवळ सामरिक नव्हे तर वैचारिकदृष्ट्या देखील भारताच्या धोरणात्मक दृष्टिकोनात एक टप्पा ठरली आहे. गांधीजींनी जरी अहिंसेचा आग्रह धरला होता, तरी १९४७ मध्ये पहिल्या काश्मीर युध्दाच्या वेळी हल्ला केल्यावर त्यांनी युद्धाच्या गरजेस नकार दिला नव्हता. “युद्ध हे अमानवी आहे, पण जर काश्मीरला वाचवण्यासाठी ते गरजेचे असेल, तर ते टाळणे योग्य नाही,” असे गांधींनी स्पष्टपणे म्हटले होते. (संदर्भ : विकीपिडीया)
आजचा भारत त्या दृष्टिकोनाची व्यावहारिक पुर्नमांडणी करत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे अशा धोरणात्मक अहिंसेचे प्रतीक ठरते. जिथे देशाच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी कठोर निर्णय घेतले जातात, पण युद्धाची तीव्रता टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो.
या कारवाईला जागतिक पातळीवरून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या –
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी दोन्ही देशांनी “अधिक संयम बाळगावा” असे म्हणत संवादाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑपरेशनवर खेद व्यक्त करत, “आशा आहे की हे लवकर संपेल,” असे म्हटले.
विदेश मंत्री मार्को रुबिओ यांनी भारताच्या कारवाईला निषेध न करता, पहलगाम हल्ल्याचे दोषी न्यायासमोर यावेत यावर भर दिला.
चीनने संयमाचे आवाहन करत “क्षेत्रीय स्थैर्य धोक्यात न आणण्याचे” आवाहन केले. ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेविड लॅमी यांनी भारत-पाकने तातडीने संवाद सुरू करावा असे सूचित केले.
इस्त्रायलने भारताच्या स्वसंरक्षणाच्या हक्काला पाठिंबा दर्शवला, तर रशिया आणि फ्रान्स यांनी तणाव न वाढवण्याची गरज अधोरेखित करत, कूटनीतीच्या माध्यमातून मार्ग काढावा असे सांगितले.
या पार्श्वभूमीवर, भारताची भूमिका ‘गांधींच्या भारताचा’ नव्या स्वरूपात विचार करण्यास भाग पाडते. शांतता म्हणजे दुर्बलता नव्हे, तर धोरणात्मक संयम हेच खरे शौर्य आहे. ही भूमिका भारत जगाला दाखवत आहे.
तात्काळ परिणाम म्हणून, भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव निर्माण झाला असून, दोन्ही बाजूंनी सैन्य सज्जतेत वाढ झाल्याचे वृत्त आहे.
दीर्घकालीन परिणाम म्हणून, भारताची दहशतवादाविरोधातली भूमिका अधिक स्पष्ट व निर्णायक ठरेल. यामुळे भारताची जागतिक प्रतिमा एका शांततामूल्ये जपणाऱ्या, पण वेळ आल्यास निर्णायक पावले उचलणाऱ्या राष्ट्राची म्हणून बळकट होईल.
‘ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी प्रतिक्रिया नव्हती, ती एका विचारशील धोरणाची सुरुवात होती. जिथे शांतीसाठी निर्णय घ्यावे लागतात आणि गांधींच्या विचारांची नव्याने मांडणी होते. भारत हा देश आता शांततेचा प्रचारक तर आहेच, पण आवश्यक असेल तेव्हा तो रक्षकही ठरतो.
कालदर्शिका –
१८४६–१९४५ : संस्थानिक राज्य
१९४६–१९४७ : काश्मीर अशांतता आणि विलय
१९४८ : युद्ध आणि राजनय
१९४९–१९६२ : जनमत चाचणीचा खोडा
१९६३–१९८७ : काश्मिरी राष्ट्रवादाचा उदय
१९८७–२०२५ : काश्मीर बंड- ऑपरेशन सिंदूर
माध्यमांची भूमिका आणि संतुलन-
देशातील प्रसारमाध्यमांनी देखील अशा परिस्थितीत तथ्य, समजूतदारपणा आणि संतुलन यांचं भान ठेवणं आवश्यक आहे. अति उत्साही मथळे, धोकादायक विश्लेषणं किंवा भावना भडकावणारे कार्यक्रम यामुळे जनमत भलत्याच दिशेने जाण्याची शक्यता असते. माध्यमांनी ‘प्रथम सत्य, मग प्रतिक्रिया’ या तत्वाचा स्वीकार केला पाहिजे.
आपण एक लोकशाही राष्ट्र आहोत, ज्यात प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मात्र त्या स्वातंत्र्याला उत्तरदायित्वाची जोड असावी लागते. संकटाच्या प्रसंगी देशाच्या निर्णयांचा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर योग्य अर्थ लागावा, यासाठी सोशल मीडिया आणि नागरिकांनी संयम, सदसद्विवेक आणि संवेदनशीलता दाखवणं अत्यावश्यक आहे. ही वेळ एकमेकांवर शंका घेण्याची नाही, तर सत्य, सद्भाव आणि शांतीसाठी एकत्र उभं राहण्याची आहे.
———————————————————————————————–