कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रौत्सवाची धामधूम सुरू झाली असून तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. भाविकांना देवीचे दर्शन सुरळीत, कमी वेळेत आणि सोयीस्कर व्हावे यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शन रांगेसाठी मंडप उभारण्यात आला असून ऊन वा पावसाचा त्रास भाविकांना होणार नाही, अशी काळजी घेतली गेली आहे.
नवरात्रौत्सव काळात रोज सरासरी तीन ते चार लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. या काळात देवीचा पालखी सोहळा, नगर प्रदक्षिणा तसेच ललित पंचमीच्या दिवशी होणारी टेंबलाई देवीची भेट हे सोहळे विशेष आकर्षण ठरणार आहेत. त्याचबरोबर मंदिरात धार्मिक पूजाविधी, भजन, कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.
दरम्यान, वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने यंदा पोलिसांकडून एआय ( कृत्रिम बुद्धिमत्ता ) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. यासाठी दोन खासगी कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या यंत्रणेमार्फत मंदिर परिसरातील गर्दीवर सतत नजर ठेवली जाईल. संभाव्य आपत्कालीन धोके वा दुर्घटनांची पूर्वसूचना मिळाल्यास पोलिस तत्काळ कारवाई करू शकतील.
वाहतूक व्यवस्थापनासाठी देखील या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार असून शहरातील रस्त्यांवरील गर्दी, कोंडी व पर्यायी मार्गांची माहिती थेट वाहतूक पोलिसांना मिळणार आहे. यामुळे भाविकांचा प्रवास सुकर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर भक्तिभावाने न्हाऊन निघाले असून यंदाचा उत्सव भक्तीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिक सुरक्षिततेने पार पडणार आहे.
सुवर्ण दागिन्यांना झळाळी; सोन्याची पालखीही स्वच्छ
