नवी मुंबई विमानतळाशी मुंबईला लवकरच जलमार्गाने जोडणार

0
278
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज 

लवकरच कार्यान्वित होणाऱ्या नवी मुंबई विमानतळाशी मुंबईला लवकरच जलमार्गाने जोडण्यात येणार आहे. दोन्ही शहरांना जोडण्यासाठी वॉटर टॅक्सी सुरू करण्यात येणार असून त्यासाठी गरजेच्या ठिकाणी जेटी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत, अशी सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरेमंत्री नितेश राणे यांनी  दिली. वॉटर टॅक्सीमुळे मुंबईहून नवी मुंबई विमानतळाला ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे.

वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत मंत्रालयात बैठक घेण्यात आली. परिवहन, बंदरे आणि हवाई वाहतूक विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणचे ब्रिजेश सिंघल, महाराष्ट्र सागरी मंडळाचे प्रदीप बढिये यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. वॉटर टॅक्सी वाहतूक सुरू करण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या शक्यतांवरही यावेळी विस्तृत माहिती घेण्यात आली.

‘वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी टर्मिनल उभारणी टप्प्याटप्प्याने सुरू करावी, तसेच यासाठी विमानतळ प्राधिकरणाने आवश्यक परवानग्यांसाठी प्रस्ताव सादर करावेत, मालवाहतुकीसाठीही जेटी उभारण्यासाठी ठिकाणे निश्चित करावीत,’ अशा सूचना राणे यांनी दिल्या. सध्या मुंबईहून नवी मुंबईला जाण्यासाठी सायन-पनवेल महामार्ग आणि विलासराव देशमुख पूर्व मुक्त मार्ग असे दोन मार्ग तसेच, हार्बर रेल्वे मार्ग उपलब्ध आहेत.

रेडिओ जेटी ते नवी मुंबई विमानतळ असा वॉटर टॅक्सीचा प्रस्ताव असून त्या मार्गात इतर थांब्यांचीही चाचपणी यावेळी करण्यात आली. या प्रवासासाठी इलेक्ट्रिक बोटींचा वापर करण्यात येणार असल्याने प्रदूषण कमी होण्यास तसेच पर्यावरणाला पूरक असा नवा मार्ग खुला होणार आहे. तसेच, कुठलाही कोंडीशिवाय वेगात नवी मुंबई गाठणे नागरिकांना शक्य होईल.

‘मुंबईच्या आसपास जलवाहतुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असून त्याचा वापर होणे गरजेचे आहे. प्रवासी वाहतुकीबरोबरच मालवाहतुकीसाठीही या मार्गाचा वापर होऊ शकतो. नवी मुंबई, ठाणे ही शहरे मुंबईशी जलमार्गाने जोडणे सहज शक्य असून त्यासाठी चोख नियोजन आणि इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे,’ असे राणे यांनी सांगितले.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here