spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeराजकीयप्रभागरचना जाहीर : इच्छुकांसमोर वाढली आव्हाने

प्रभागरचना जाहीर : इच्छुकांसमोर वाढली आव्हाने

कोल्हापूर व इचलकरंजी तील राजकीय समीकरणे ढवळून निघणार

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूर जिल्ह्यातील दोन महत्त्वाच्या महापालिका कोल्हापूर आणि इचलकरंजी यांच्या बहुप्रतिक्षित प्रभाग रचनेची घोषणा अखेर बुधवारी करण्यात आली. मागील काही महिन्यांपासून याबाबत तर्क-वितर्क सुरू होते. काल या रचनेच्या घोषणेचा संकेत मिळाल्याने नगरवासीयांसह इच्छुकांचे लक्ष या घडामोडीकडे वेधले गेले होते. कोल्हापुरात रचना दुपारीच जाहीर झाल्याने महापालिकेच्या आवारात इच्छुकांची मोठी गर्दी उसळली. मात्र, इचलकरंजीत प्रशासकीय यंत्रणेतील विस्कळीतपणामुळे रचना रात्री उशिरा जाहीर झाली.
कोल्हापुरात २० प्रभाग, ८१ नगरसेवक
कोल्हापूर महापालिकेच्या नव्या प्रभाग रचनेनुसार एकूण २० प्रभागातून ८१ नगरसेवक निवडले जाणार आहेत. एक ते १९ प्रभाग हे चार सदस्यीय आहेत, तर २० क्रमांकाचा प्रभाग हा पाच सदस्यीय ठेवण्यात आला आहे. प्रत्येक प्रभागात सरासरी २५ ते ३० हजार मतदारांचा समावेश आहे. या रचनेवर १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या पंधरवड्यात या रचनेवर होणाऱ्या चर्चांना विशेष महत्त्व लाभणार आहे.
इचलकरंजीत पहिलीच कसोटी
इचलकरंजी महापालिकेची स्थापना होऊन तीन वर्षे उलटली असली तरी अद्याप निवडणूक झालेली नाही. त्यामुळे शहरातील नागरिक आणि इच्छुक उमेदवार या निवडणुकीकडे वेगळ्याच नजरेने पाहत आहेत. तथापि, रचना जाहीर करण्यात झालेल्या विलंबामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार प्रभागांचे भौगोलिक क्षेत्र वाढवले गेले आहे. त्यामुळे इचलकरंजीतील ही पहिलीच निवडणूक स्थानिक राजकारणातील दिशा ठरवणारी ठरणार आहे.
दीडपट विस्तार, मोडतोड आणि आव्हाने
या वेळी प्रभागांचे भौगोलिक क्षेत्र मागील निवडणुकीच्या तुलनेत जवळपास दीडपट वाढवले गेले आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोडतोड झाल्याने जुन्या राजकीय समीकरणांमध्ये बदल होणार आहेत. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे इच्छुकांसाठी मतदारांशी संपर्क, प्रचाराचा खर्च आणि संघटनात्मक बांधणी ही आव्हानात्मक ठरणार आहेत. एका प्रभागात अनेक प्रतिस्पर्धी गट सक्रिय झाल्यास ‘स्थानिक विरुद्ध परप्रांतीय’, ‘जातीय संतुलन’ आणि ‘पक्षीय हित’ यांचे समीकरण नव्याने मांडावे लागणार आहे.
सात वर्षांपासून प्रशासकराज
कोल्हापूर महापालिकेत गेली सात वर्षे तर इचलकरंजी महापालिकेच्या स्थापनेपासून गेलेली तीन वर्षे प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील नेत्यांना आपली ताकद दाखवण्याची संधीच मिळाली नव्हती. निवडणुका वारंवार पुढे ढकलल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला होता. आता मात्र प्रभागरचना जाहीर झाल्याने इच्छुकांनी ‘गुडघ्याला बाशिंग’ बांधून तयारीला सुरुवात केली आहे.
राजकीय प्रतिक्रिया
महायुतीच्या नेत्यांनी नव्या प्रभाग रचनेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, ही रचना लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय्य आहे. परंतु, विरोधकांनी प्राथमिक प्रतिक्रिया देताना काही प्रभागांमध्ये जाणीवपूर्वक विभागणी करण्यात आल्याचा आरोप केला आहे. “ संपूर्ण अभ्यासांती आमची अधिकृत भूमिका जाहीर करू,” असे विरोधी पक्षांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत या रचनेवरून राजकीय वादंग रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकांच्या प्रभाग रचनेने स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण केले आहे. विस्तारित प्रभाग, चार सदस्यीय पद्धती आणि बदललेल्या सीमारेषा यामुळे इच्छुकांसमोर प्रचाराचे, संघटनाचे आणि निवडणूक खर्चाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. येणाऱ्या निवडणुकीत मतदारांचा कौल कोणाला मिळणार, हे पाहण्यासाठी जिल्हावासीयांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
———————————————————————————————
RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments