आगामी गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावरून मोठ्या प्रमाणात कोकणवासीय आपल्या गावी जाणार असल्याने महामार्गावरील सर्व अपुरी कामे तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
इंदापूर–माणगाव परिसरातील रस्त्यासाठी लागणारा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, महामार्गावरील चौपदरीकरण, रस्त्यातील खड्डे भरणे, पुलांची कामे, दिशादर्शक फलकांची उभारणी, ट्रॉमा केअर सेंटर तसेच दर चाळीस किलोमीटरवर शौचालयांची व्यवस्था यासह इतर सर्व कामे मिशन मोडवर पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले.
मंत्रालयात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाविषयी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नियोजन विभागाचे सचिव डॉ. राजगोपाल देवरा तसेच कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे, रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल, राष्ट्रीय महामार्ग व पोलीस वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे अभियंते आणि विविध संस्था प्रतिनिधी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, “ गणेशोत्सव काळात प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वाहतूक कोंडी टाळण्याचे काटेकोर नियोजन करावे. धोकादायक खड्डे तातडीने भरून घेण्यासाठी दोन विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांचे संपर्क क्रमांक जनतेला उपलब्ध करावेत, तसेच आलेल्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही व्हावी.”
बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीमार्फत उर्वरित कामांवर सतत देखरेख ठेवून त्यांची वेळेत पूर्तता केली जाणार आहे.
तसेच, ज्या ठिकाणी जास्त वाहतूक कोंडी होते त्या रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील ठिकाणांची पाहणी करून वाहतूक नियोजन करण्यात यावे, अवजड वाहनांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, घाट रस्ते आणि वळणांवर आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवावी आणि वैद्यकीय सोयी-सुविधांचीही उपलब्धता सुनिश्चित करावी, असे निर्देशही पवार यांनी दिले.