कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापुरात काल रात्री रिमझिम पाऊस झाला. यांमुळे दोन दिवस वाढलेला उष्मा थोडा कमी झाला. पण रात्री नंतर हा पाऊस थांबला. परत आज सकाळपासून उन पडले आहे. आज कोल्हापूरमध्ये दिवसभर कोरडे हवामान राहील मात्र संध्याकाळ पासून रात्रीपर्यंत मध्यम ते हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मराठवाडा, विदर्भ आणि कोकण या भागात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. हवामान खात्याने या भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईत सकाळपासूनच हलक्या ते मध्यम स्वरुपात पाऊस सुरू असून वातावरण दमट आणि ढगाळ आहे. मुंबई-ठाणे प्रांतातही पुढील २४ तासांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, पुढील ५ दिवसांत पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज आहे.
ऑगस्टच्या सुरुवातीला वेग पकडलेला मान्सून सध्या देशाच्या अनेक भागांत मंदावला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, ऑगस्ट महिन्यात साधारणपणे ‘ब्रेक-इन-मॉन्सून’ची परिस्थिती निर्माण होते, जी साधारण १० दिवस टिकते. १ जून ते ७ ऑगस्टदरम्यान सरासरी पाऊस ११५ टक्क्यांवरून १०२ टक्क्यांपर्यंत घसरला आहे आणि पुढील चार दिवसांत आणखी घट होण्याची शक्यता आहे.
पश्चिम आणि मध्य भारतातील गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि मध्य प्रदेशात काल पाऊस झाला नाही. दक्षिण भारतात केवळ कर्नाटकाचा दक्षिण भाग, रायलसीमा, केरळ आणि तमिळनाडूच्या आतील भागांत हलक्या सरी कोसळल्या. ईशान्य भारत, जो नेहमी पावसासाठी ओळखला जातो, तिथेही पावसाचा तुटवडा आहे. मात्र पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा आणि विदर्भाच्या काही भागांत चांगला पाऊस नोंदवला गेला.
——————————————————————————————————