कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास महाराष्ट्र शासनाचा तीव्र विरोध असून याबाबत २१ मे रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सोबत मंत्रालय स्तरावर दुपारी ३.०० वा. बैठक होणार असल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
कोल्हापूर सह सांगली जिल्ह्यामध्ये येणाऱ्या महापुराला कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरण कारणीभूत असल्याचा निष्कर्ष जल तज्ञांनी काढलेला आहे. या महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्र पुरबाधित होत असून अनेक गावांना स्थलांतर करावे लागते. परिणामी दीड ते दोन महिने जिल्ह्यातील दळणवळणासह सर्व यंत्रणा ठप्प होत असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान या महापुरामुळे झालेले आहे.
अलमट्टी धरणातून विसर्ग वेळेत न केल्यामुळे त्याचा फुगवटा हा पाठीमागील बाजूस येत असतो त्यामुळे कोल्हापूर सह सांगलीला दरवर्षी पुराचा फटका बसत आहे. याच दरम्यान कर्नाटक राज्याने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याबाबत सुरू केलेल्या हालचालीमुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये पुरबाधित शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण पसरला आहे.
या प्रश्नी राज्य शासन अलमट्टी धरणाच्या विरोधात ठामपणे असून प्रसंगी न्यायालयीन लढाई देखील लढण्यासाठी सज्ज आहे. पूरबाधित असलेल्या जनतेच्या भावना व येथील स्थानिक लोकप्रतिनिधींचा यासाठी सातत्याने सुरू असलेला पाठपुरावा या अनुषंगानेच बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील संवेदनशील आहेत. जलसंपदा मंत्री यांचे अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीमध्ये राज्य शासनाच्या वतीने करावयाच्या सर्व उपाययोजनांवर चर्चा करण्यात येणार आहे.
————————————————————————————————






