कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
शासनामार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमध्ये फळ पिकाच्या क्षेत्र विस्तारासाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने व शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी केळी फळ पिकाचा समावेश करण्यात आलेला आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी आपल्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये अर्जदाराने विहीत नमुन्यात अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.
वाढत्या नागरीकरणामुळे समाजामध्ये जीवनशैली विषयक वाढत असलेले निरोगी आरोग्य ठेवण्याची क्षमता केळी या फळ पिकामध्ये आहे. केळी हे प्रथिनयुक्त, कॅल्शीयम, मॅग्नेशियम, पोटॅशियम व फायबर या पोषक घटकांनी समृध्द आहे. केळी हाडांच्या बळकटीकरणास मदत करते, पचन शक्ती सुधारते, स्नायुंचे आरोग्य सुधारते. शरीरातील उर्जा पातळी सुधारण्यास व ह्यदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. केळी मधील ट्रीप्टोफॅन या घटकाच्या उपलब्धतेमुळे मानसिक ताण तणाव कमी होण्यासाठी देखील मदत होते.
प्रति – १०० ग्रॅम केळीमध्ये प्रथिने (gm) १.०९, कर्बोदके (gm) २२.८४ पोटॅशियम (mg) ४२२.०० मॅग्नेशियम (mg) २७.०० व क जीवनसत्व É(mg) ८.७० इतकी पोषणमूल्ये असतात.
अर्जदार निवडीचे निकष –
या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जदारास कमीत कमी पाच गुंठे व जास्तीत जास्त पाच एकर प्रति लाभार्थी क्षेत्र मर्यादा राहील. इच्छुक लाभधारकांच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे. ही जमीन कुळ कायद्याखाली येत असल्यास व ७/१२ च्या उताऱ्यावर कुळाचे नाव असेल तर योजना राबवीत असताना कुळाची संमती घेण्यात यावी. इच्छुक लाभार्थ्याने आपला अर्ज ग्रामपंचायतीमध्ये सादर करावा. अर्जामध्ये फळबागाचे कार्य ग्रामपंचायत किंवा फलोत्पादन (कृषी) विभाग यापैकी कोणाकडून राबविण्यास रस आहे त्याचा स्पष्ट उल्लेख करावा.
* अनुसुचित जाती/ जमाती/ दारिद्र्य रेषेखालील/ इंदिरा आवास योजनेतील लाभार्थ्यास प्राधान्य.
* आवश्यक कागदपत्रे – जॉबकार्ड, 7/12, 8-अ/ आधारकार्ड, बँक पासबुक, इ.
केळीसाठी अनुदान –
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमध्ये केळीसाठी प्रथम वर्षात जमीन तयार करणे, रोपे लागण, आंतर मशागत व पिक संरक्षणासाठी एकूण रक्कम रुपये १ लाख ९७ हजार ७२४, दुसऱ्या वर्षात नांगी भरणे, खते देणे, आंतर मशागतीसाठी एकूण रुपये ४९ हजार ७९६ व तिसऱ्या वर्षात खते व पाणी देणे, व पिक संरक्षण व आंतर मशागतीसाठी एकूण रक्कम रुपये ४१ हजार ८०० असे एकूण प्रति हेक्टरी रक्कम एकूण २ लाख ८९ हजार ३२० अनुदान तीन वर्षासाठी मंजूर आहे. अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते.
केळीसाठी तीन वर्षात हेक्टरी मंजूर अनुदान (आर्थिक – रक्कम रुपयात) –
लागवडीपूर्व जमीन तयार करणे, खड्डे खोदणे व काटेरी कुंपण –
प्रथम वर्ष-७० हजार १४०, द्वितिय वर्ष-00, तृतिय वर्ष-00 असे एकूण ७० हजार १४० रुपये अनुदान
खते देणे , रोपे खरेदी व रोपांची लागण करणे-
प्रथम वर्ष- ८४ हजार ७८४, द्वितिय वर्ष-00, तृतिय वर्ष-00 असे एकूण ८४ हजार ७८४ रुपये अनुदान
नांगी भरणे –
प्रथम वर्ष- 0, द्वितिय वर्ष- ७ हजार ९९६, तृतिय वर्ष-0 असे एकूण ७ हजार ९९६ रुपये अनुदान.
खते देणे (शेणखत)-
प्रथम वर्ष- १५ हजार ८४०, द्वितिय वर्ष- १५ हजार ८४०, तृतिय वर्ष-१५ हजार ८४० असे एकूण- ४७ हजार ५२० रुपये अनुदान
आंतरमशागत व घड व्यवस्थापन-
प्रथम वर्ष- ६ हजार २४०, द्वितिय वर्ष- ६ हजार २४०, तृतिय वर्ष-६ हजार २४० असे एकूण १८ हजार ७२० रुपये अनुदान
पीक संरक्षण, पाणी देणे व संकीर्ण-
प्रथम वर्ष- २० हजार ७२०, द्वितिय वर्ष- १९ हजार ७२०, तृतिय वर्ष- १९ हजार ७२० असे एकूण ६० हजार १६० रुपये अनुदान
————–
प्रथम वर्षासाठी १ लाख ९७ हजार ७२४ रुपये, व्दितीय वर्षासाठी ४९ हजार ७९६, तृतीय वर्षासाठी ४१ हजार ८०० असे एकूण २ लाख ८९ हजार ३२० रुपये अनुदान मिळते.
जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये सहभागी होवून लाभ घेतलेले शेतकरी खालीलप्रमाणे आहेत- शिरोळ – १०७, हातकणंगले-१३, शाहूवाडी-०१, पन्हाळा-१२, राधानगरी- ३२, कागल-१५, गगनबावडा- ०२, गडहिंग्लज- ११, भुदरगड-०३, आजरा- ०२, चंदगड-११ असे एकूण २०९ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे.
तांत्रिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील कृषी विभागाशी तसेच गावपातळीवर कृषी सहाय्यकांशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी उपसंचालक नामदेव परीट यांनी केले आहे.
—————————————————————————————————–