कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
महाडीबीटी शेतकरी योजना अंतर्गत आता लॉटरी पद्धती ऐवजी “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या नव्या नियमानुसार अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना आता संधी अधिक निश्चित झाली असून, उशीराने अर्ज करणार्यांसाठी अनुदानाची प्रतीक्षा वाढू शकते.
यापूर्वी महाडीबीटी पोर्टलवर विविध कृषी योजनांसाठी अर्ज केले जात असत आणि त्यावर लॉटरीद्वारे लाभार्थी निवडले जात. उदाहरणार्थ, जर ५० लाभांसाठी ५०० अर्ज आले तर केवळ ५० शेतकऱ्यांनाच लाभ मिळत असे आणि उर्वरित शेतकऱ्यांना परत अर्ज करावा लागे. आता या पद्धतीत बदल करत सर्व प्रलंबित अर्जदारांची यादी तयार केली जाईल, आणि लाभ “अर्ज सादर केल्याच्या तारखेच्या क्रमाने” दिला जाईल.
उदाहरणार्थ, जर एखाद्या शेतकऱ्याने २० तारखेला अर्ज केला आणि दुसऱ्या एका शेतकऱ्याने २१ तारखेला, तर २० तारखेचा अर्ज प्राधान्याने विचारात घेतला जाईल. अशा प्रकारे अर्जाची तारीख ही ‘ज्येष्ठते’चे निकष ठरवेल, आणि अनुदान देताना हाच आधार असेल.
अत्यंत महत्त्वाचे म्हणजे, लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्याकडे वैध Farmer ID असणे आवश्यक आहे. अन्यथा, लाभाची संधी पुढील अर्जदाराकडे जाईल. त्यामुळे शेतकरी बांधवांनी जवळच्या CSC केंद्रावर जाऊन आपला फार्मर आयडी लवकरात लवकर तयार करून घ्यावा.
महाडीबीटी पोर्टलवरून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, मळणी यंत्र, पेरणी यंत्र, नांगर, फवारणी पंप, शेततळे, शेडनेट अशा अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळतो. या योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करून युजर आयडी आणि पासवर्ड घेणे आवश्यक आहे. त्यानंतर लॉगिन करून संबंधित योजनेसाठी अर्ज करता येतो.
——————————————————————————————-



