मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्यातील ६७६ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांचे बिगुल अखेर वाजू लागले आहे. गेल्या पाच वर्षांपासून स्थगित ठेवण्यात आलेल्या या निवडणुका आता ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत होणार असल्याचे संकेत आहेत. मात्र, एकाच टप्प्यात सर्व निवडणुका घेणे शक्य नसल्यामुळे, राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका तीन टप्प्यांत घेण्याचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या निवडणुकांसाठी सुमारे ६.५ लाख ईव्हीएमची गरज असून सध्या उपलब्ध यंत्रांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे ईव्हीएम अभावामुळे एकाचवेळी मतदान घेणे अशक्य ठरत असून आयोगाने टप्प्याटप्प्याने निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्याचे नियोजन हाती घेतले आहे.
सप्टेंबरमध्ये प्रभाग रचना
निवडणूक प्रक्रियेपूर्वी महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रभाग रचना, तीही आता अंतिम टप्प्यात आहे. नगरविकास विभागाने ९ टप्प्यांमध्ये प्रभाग रचनेचा कार्यक्रम निश्चित केला असून, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण राज्यातील प्रभाग रचना पूर्ण होणार आहे.
-
मुंबई महापालिका व अ, ब, क दर्जाच्या महापालिकांची अंतिम प्रभाग रचना
– २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान जाहीर होणार -
ड दर्जाच्या महापालिकांची अंतिम प्रभाग रचना
– २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान जाहीर होणार -
नगरपरिषद व नगरपंचायतींची प्रभाग रचना
– २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर होणार
यावर्षीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राजकीय पक्षांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत. प्रभाग रचना जाहीर होताच अनेक ठिकाणी राजकीय हालचालींना वेग येणार असून पक्षांतर्गत घडामोडींना सुरुवात होईल.
निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेला नसला तरी, ईव्हीएमची उपलब्धता, प्रभाग रचना आणि मतदार यादी यासंदर्भातील हालचालींवरून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा शंखनाद लवकरच होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे आगामी काही आठवडे हे राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.