spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeकलामाध्यमांची मर्यादा आणि जबाबदारी : सनसनाटी पलीकडे विचार करण्याची गरज

माध्यमांची मर्यादा आणि जबाबदारी : सनसनाटी पलीकडे विचार करण्याची गरज

विशेष संपादकीय….✍️

वास्तवाला गृहितकांनी झाकोळले तर पत्रकारिता मार्गभ्रष्ट होते

आजची पत्रकारिता विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडिया ही सतत ‘ब्रेकिंग न्यूज’च्या मागे धावताना दिसते. घडामोडींचा वेग जितका वाढतोय, तितकाच माध्यमांचा दृष्टीकोनही उथळ आणि सनसनाटी बनतो आहे. यातून कधीकधी समाजापुढे वास्तवाच्या ऐवजी गृहितक, शंका आणि एकतर्फी मांडणीचा गोंधळ उभा राहतो.

राजकारणात माणसांपेक्षा कथानक महत्त्वाचं ?

नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित एक कथित वादग्रस्त बातमी काही वाहिन्यांनी प्रचंड उचलून धरली. इतकी की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वतः अजित पवार यांनाही पत्रकार परिषद घेऊन खुलासा करावा लागला. प्रश्न असा आहे की, एका अशा घडामोडीभोवती इतकी ऊर्जा केंद्रित करणे माध्यमांसाठी आवश्यक होते का ?

राजकीय व्यक्तींच्या नैतिक वर्तनाबाबत चर्चा व्हायलाच हवी. मात्र, या चर्चांना मर्यादा आणि सुसंगत संदर्भ असणे आवश्यक आहे. अन्यथा या चर्चा सामाजिक फायद्याऐवजी अविश्वासाचे वातावरण निर्माण करतात.

प्रश्न विचारणे आणि मत लादणे – यातील सीमारेषा

‘सॉक्रेटिक प्रश्न’ विचारण्याच्या नावाखाली काही पत्रकार एकतर्फी निर्णय लादताना दिसतात. विश्लेषणाऐवजी आरोप, आणि वास्तवाऐवजी कल्पनांना महत्त्व देत असताना पत्रकारितेची शास्त्रीयता हरवते आहे.

पहेलगाम घटनेनंतर काही माध्यमांनी भारत-पाकिस्तान संबंधांबाबत केलेली मांडणी देखील याच स्वरूपाची होती. युद्धजन्य आविर्भाव, विरोधकांचे रंगवलेले चित्रण, आणि समाजाच्या भावना भडकवणारे शब्द हे पत्रकारितेचे साधन असू शकत नाहीत.

वाचक-प्रेक्षकांचा विसर पडतोय का  ?

तंत्रज्ञानामुळे माध्यमांचा पोच अधिक खोलवर आणि वेगवान झाला आहे. पण त्याच वेळी प्रेक्षकांचा संयम, विवेक आणि विश्वास गमावत चालल्याचं चित्र दिसतं आहे. सनसनाटी ही काही काळची प्रसिद्धी मिळवून देते, पण दीर्घकालीन विश्वासार्हतेचा मुलाधार ठरत नाही.

उपसंहार : स्वतःकडे बघण्याची वेळ

आज इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी स्वतःकडेच कटाक्ष टाकण्याची वेळ आली आहे. प्रशिक्षित आणि तटस्थ पत्रकार, विश्लेषणाआधी चिंतन, आणि प्रत्येक बातमीमागे सामाजिक जबाबदारीची जाणीव – या तत्त्वांवर आधारित पत्रकारिताच समाजाचा खरा आरसा ठरू शकते.

समाजाला माहिती देण्याबरोबरच मते घडवणारी शक्ती म्हणून माध्यमे अत्यंत प्रभावी आहेत. ही शक्ती जबाबदारीने वापरणे ही काळाची गरज आहे. माध्यमांच्या ‘हाईप’मुळे मानसिक दबाव आणि बाजारपेठेतील लाभ हे जितके आकर्षक, तितकेच धोका निर्माण करणारे आहेत. म्हणूनच  थांबा, विचार करा, आणि मग पुढे बोला.

———————————————————————————————

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments