काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लाडकी बहीण योजना बंद होण्याबाबत महायुती सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर ही योजना बंद होईल, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते, निवडणुका असेपर्यंतच या योजनेअंतर्गत लाभाची अपेक्षा करता येईल. जिल्हा परिषद, नगर परिषद आणि महानगरपालिका निवडणुका झाल्यानंतर या योजनेचे हप्ते थांबवले जातील, असा दावा त्यांनी केला.
राज्यावर वाढलेल्या कर्जाचे कारण देत, हळूहळू ही योजना बंद केली जाईल, असे वडेट्टीवार यांनी नमूद केले. अशा आरोपांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
विरोधकांकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याबाबत अनेक उलट-सुलट अफवा पसरवल्या जात असल्याचे शिंदे यांनी म्हटले. परंतु, ही योजना कधीही बंद होणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. हा एकनाथ शिंदेचा शब्द असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.