कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
स्वच्छ भारत मिशन (शहरी) अंतर्गत आयोजित ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५’ मध्ये मध्य प्रदेशातील इंदूर शहराने पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. इंदूरने सलग आठव्या वर्षी देशातील ‘सर्वात स्वच्छ शहर’ बनण्याचा मान पटकावला आहे. तर गुजरातमधील सुरत शहराने दुसरा क्रमांक पटकावला आहे. या सर्वेक्षणात नवी मुंबईने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. या स्पर्धेतील एकूण १० पुरस्कार राज्याला मिळाले आहेत. पुरस्कार वितरण कार्यक्रम दिल्लीमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मूर्म यांच्या हस्ते झाला. यावेळी ७८ महापालिका, नगरपालिकांना स्वच्छतेचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, स्वच्छ महाराष्ट्र मिशनचे संचालक नवनाथ वाठ यांच्यासह महापालिका आयुक्तांनी पुरस्कार स्विकारले.
मुंबईची कामगिरीही सुधारली : स्वच्छ सर्वेक्षणात मुंबईने ३३वा क्रमांक मिळवला आहे. मागील वर्षी मुंबई ३७व्या स्थानावर होती, त्यामुळे यंदा तिच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. महापालिकेच्या प्रयत्नांना आणि नागरिकांच्या सहभागाला याचे श्रेय दिले जात आहे.
महाराष्ट्राला मिळालेले प्रमुख पुरस्कार:
नवी मुंबई – देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात स्वच्छ शहर
पुणे, ठाणे, नाशिक – स्वच्छ उपक्रमांबाबत उल्लेखनीय कामगिरी
सातारा, चंद्रपूर, अकोला – मध्यम व लहान शहर श्रेणीतील सन्मान
औरंगाबाद, सोलापूर – नविन पद्धतींचा अवलंब व नागरिक सहभाग
मुंबई – शाश्वत स्वच्छता मॉडेलसाठी विशेष मान्यता
स्वच्छ सर्वेक्षण म्हणजे काय? : स्वच्छ सर्वेक्षण ही भारत सरकारच्या आवास आणि शहरी कार्य मंत्रालयाची वार्षिक सर्वेक्षण मोहीम आहे, ज्यामध्ये शहरे त्यांच्या स्वच्छतेच्या विविध निकषांवर मूल्यमापन करून क्रमवारीत ठेवली जातात. यात नागरीकांचा अभिप्राय, कचर्याचे व्यवस्थापन, स्वच्छता प्रकल्पांची अंमलबजावणी, आणि माहिती-तंत्रज्ञानाचा वापर यांचा समावेश असतो.
इंदूरच्या यशाचे रहस्य? : इंदूरने कचरा व्यवस्थापनात ‘डोअर टू डोअर कलेक्शन’, ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करणे, तसेच जनजागृती मोहिमा राबवून इतर शहरांसमोर आदर्श ठेवला आहे. स्थानिक प्रशासनाच्या नवोपक्रमांना नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.