The country's first e-water taxi service will soon be launched as a modern and environmentally friendly solution to the growing problem of traffic in the city.
मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
शहरातील वाहतुकीच्या वाढत्या समस्येवर आधुनिक आणि पर्यावरण पूरक उपाय म्हणून देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी सेवा लवकरच सुरू होणार आहे. गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीए ( Jawaharlal Nehru Port Authority ) हा जलमार्ग अवघ्या ४० मिनिटांत पूर्ण करता येणार असून मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवास जलद आणि आरामदायी होणार आहे.
ई-वॉटर टॅक्सी – जलद, स्वच्छ आणि सुरक्षित
सध्या गेटवे ते जेएनपीए या मार्गावर लाकडी बोटींचा वापर होतो. मात्र, त्यासाठी प्रवाशांना एक तास किंवा त्याहून अधिक वेळ लागतो. ई-वॉटर टॅक्सीच्या वापरामुळे हा वेळ निम्म्यावर येणार आहे. जलद वेग, कमी आवाज आणि पर्यावरणपूरक ऊर्जा यामुळे ही सेवा आधुनिक वाहतुकीस नवे परिमाण देणारी ठरेल.
कधीपासून सेवा सुरू होणार ?
ही सेवा २२ सप्टेंबर २०२५ पासून अधिकृतपणे सुरू होणार आहे. सुरुवातीला गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीए या मार्गावर दोन वॉटर टॅक्सी चालवण्यात येणार आहेत.
टॅक्सीची वैशिष्ट्ये
एक सौर ऊर्जेवर चालणारी आणि एक विद्युतावर चालणारी ई-वॉटर टॅक्सी.
प्रत्येक टॅक्सीची क्षमता – २० प्रवासी.
गेटवे ते जेएनपीए प्रवास – अवघ्या ४० मिनिटांत.
एकेरी तिकीट – सुमारे ₹ १०० ( संभाव्य दर ).
वाहतुकीला दिलासा
मुंबईतील रस्ते वाहतुकीवरील ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर ई-वॉटर टॅक्सी सेवा मोठा दिलासा ठरणार आहे. जलद पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्याने रोजच्या प्रवाशांना वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलवाहतुकीच्या या प्रकल्पाला प्राधान्य दिले असून पुढील टप्प्यात खालील मार्गांसाठीही योजना आखली जात आहे
गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा
गेटवे ऑफ इंडिया ते अलिबाग
या योजनांमुळे मुंबईला भेडसावणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यास मदत होईल.
सौर आणि विद्युत ऊर्जेवर आधारित या जलवाहतुकीमुळे प्रदूषण कमी होईल. तसेच समुद्री वाहतुकीला प्रोत्साहन मिळून पर्यटन आणि व्यवसाय दोन्ही क्षेत्राला चालना मिळेल.