spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeहवामानराज्यात पावसाचा लपंडाव !

राज्यात पावसाचा लपंडाव !

कोकणात मुसळधार, तर पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

राज्यात यंदाही पावसाने सवयीप्रमाणे अखंड लपंडाव सुरूच ठेवला आहे. काही भागात पावसाचा जोर दिसतोय, तर काही ठिकाणी अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. भारतीय हवामान विभागाने (IMD) २१ ते २४ जून दरम्यान राज्याच्या विविध भागांसाठी पावसाचा नव्याने अंदाज वर्तवला असून, कोकणात ऑरेंज अलर्ट तर पश्चिम महाराष्ट्रातही विशिष्ट भागात पावसाचा जोर वाढण्याची चिन्हं आहेत.

कोकणात मुसळधार, ऑरेंज अलर्ट कायम

रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या तळकोकणातील जिल्ह्यांमध्ये येत्या चार दिवसांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने या भागात ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून, नागरिकांनी सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासन सज्ज आहे.

पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ हवामान; हलकासा पाऊस

सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही घाटमाथ्यांवर ( विशेषतः महाबळेश्वर, अंबा घाट, पन्हाळा भाग ) जोरदार सरींचा अंदाज आहे. मात्र, सखल भागांतील शेतकऱ्यांना अजूनही समाधानकारक पावसाची वाट पाहावी लागतेय.

शेतकरी अजूनही प्रतीक्षेत

खरीप पेरणीसाठी आवश्यक तेवढा पाऊस राज्यातील बऱ्याच भागांत अजूनही झालेला नाही. पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकरी पट्ट्यांमध्ये फक्त १५-२०% पेरण्या झाल्याचे जिल्हा कृषी विभागाचे अंदाज आहेत. जून अखेरीपर्यंत पावसाचा जोर वाढला नाही, तर पेरणी क्षेत्रावर परिणाम होणार आहे.

मराठवाडा व विदर्भात कमी पाऊस

औरंगाबाद, नांदेड, बीड, परभणी, अमरावती, अकोला, यवतमाळ या भागात काही ठिकाणी हलकासा पाऊस झाला असला तरी, पुढील तीन दिवस पावसाचा जोर कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

मुंबई व उपनगरांत मध्यम स्वरुपाचा पाऊस

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली या भागांत तुरळक व मध्यम स्वरुपाचा पाऊस राहील. मुसळधार पावसाचा फारसा इशारा नसला तरी सरींचं प्रमाण अधूनमधून वाढू शकतं.

प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन

पावसाच्या बदलत्या साच्याकडे लक्ष ठेवून प्रशासन सज्ज आहे. कोकणात दरड कोसळण्याचा, पूरपरिस्थितीचा धोका असल्याने स्थानिक यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यात पावसाचा प्रवास अजूनही अखंड विस्कळित असून, कोकणात जोरदार सुरुवात असली तरी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील शेतकरी अजूनही मान्सूनच्या मेहबानीसाठी डोळे लावून बसलेत. पुढील आठवडा निर्णायक ठरण्याची शक्यता असून, हवामान खात्याच्या अंदाजाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

——————————————————————————————-

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments