कटऑफ बदलामुळे ईडब्ल्यूएसला लाभ

एमपीएससी निकालावर मराठा आरक्षणाचा मोठा परिणाम 

0
168
Google search engine

मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर झाला असून १,५१६ उमेदवार मुलाखतीस पात्र ठरले आहेत. यंदा सर्वच प्रवर्गांमध्ये कटऑफ वाढल्याचं स्पष्ट दिसत आहे, विशेषतः खुल्या गटाचा कटऑफ गेल्या सहा वर्षांतील सर्वाधिक आहे.

मराठा आरक्षणाचा परीक्षेवर प्रभाव

गेल्या दीड वर्षात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजासाठी सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप झाले. त्यामुळे आता अनेक मराठा विद्यार्थी ओबीसी प्रवर्गातून परीक्षा देतील, ज्यामुळे ओबीसी प्रवर्गाचा कटऑफ अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ञांच्या मते, ओबीसी कटऑफ खुल्या गटाइतका जाऊ शकतो आणि स्पर्धा अधिक तीव्र होईल.

ईडब्ल्यूएस प्रवर्गाला लाभ

मराठा समाज ईडब्ल्यूएस प्रवर्गातून बाहेर पडल्याने त्यातील मुस्लीम, लिंगायत, ब्राम्हण, मारवाडी, जैन समाजाला याचा थेट फायदा होण्याची चिन्हे आहेत. यंदा ईडब्ल्यूएस चा कटऑफ एससी आणि एसटीच्या जवळपास (४४५ गुण) आहे, जे मागील वर्षांपेक्षा कमी आहे. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातील विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे.

गुण वाढीचे विश्लेषण

२०२२ च्या तुलनेत यंदा कटऑफमध्ये सुमारे २० गुणांनी वाढ, तर आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटात ४५ गुणांनी मेरिट कमी झाली आहे. ४३१ जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली असून उपजिल्हाधिकारी, असिस्टंट कमिशनर, उपअधीक्षक, अबकारी विभाग यांसारख्या महत्त्वाच्या पदांसाठी उमेदवारांची निवड होणार आहे.

ठळक मुद्दे 
  • ओबीसीचा कटऑफ पुढील वर्षांत आणखी वाढण्याची शक्यता

  • खुल्या गटातील स्पर्धा तीव्र होण्याची चिन्हे

  • EWS प्रवर्गासाठी गुणांची अट सुलभ होण्याची शक्यता

  • मराठा समाजासाठी आरक्षणाचा स्वतंत्र पर्याय उपलब्ध

राज्यसेवा परीक्षेतील हा निकाल फक्त गुणांपुरता मर्यादित नसून महाराष्ट्रातील सामाजिक आणि आरक्षण धोरणांवरही त्याचा दूरगामी परिणाम होणार आहे. विद्यार्थ्यांसमोर नवीन आव्हाने आणि संधी दोन्ही उभ्या ठाकल्या आहेत.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here