शेतकऱ्यांना प्रति एकरी ३० हजार द्या

राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

0
72
Google search engine
मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी आणि पर्जन्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक नुकसानीत आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे, ज्यात त्यांनी शेतकऱ्यांना प्रति एकरी किमान ३० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. त्याशिवाय, राज ठाकरेंनी इतर काही मागण्याही पत्रात मांडल्या आहेत.

राज्यावर अतिवृष्टीचे संकट आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामीण भागातील नागरिक अडचणीत सापडले आहेत. लाखो एकर शेती धोक्यात आली आहे. सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी केली जात आहे. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी ५ महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. 
पत्रात म्हंटले आहे,
  • कुठल्याही निकषांच्या चौकटीत न लावता, सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा. एकरी ७ आणि ८ हजार रुपये इतक्या तुटपुंजी नुकसान भरपाईने काहीही होणार नाही. त्याऐवजी एकरी किमान ३० हजार रुपये नुकसान भरपाई घोषित करा. कारण आता शेतकऱ्याची घडी बसायला किमान १ वर्ष लागेल.
  • गेल्या काही वर्षातल्या बेफाम उधळपट्टीने, राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झालेली असली तरी, सरकारने हात आखडता घेऊ नये. वेळेस केंद्राकडे पाठपुरावा करावा आणि मदतीचं पॅकेज केंद्राकडून मिळवावं. केंद्र सरकारने बिहारला असं पॅकेज या आधी दिलं आहेच त्यामुळे महाराष्ट्राला द्यायला काही हरकत नसावी. आणि त्यासाठी दिल्लीचा जो काही पाठपुरावा करावा लागेल तो करावा. फक्त स्वतःच्या वैयक्तिक तक्रारींसाठी किंवा घटक पक्षातील संघर्षासाठी आम्ही दिल्लीत जातो असं चित्र न दिसता, सरकारमधले सगळे पक्ष राज्यासाठी पण दिल्लीत धाव घेतात हे पण राज्याला दिसू दे.
  • अशा आपत्तीचा पहिला फटका बसतो तो मुला-मुलींच्या शिक्षणाला. एकाही मुलाचं शिक्षण बंद होणार नाही. त्याला लागणारी वह्या-पुस्तकं मिळतील आणि अशा परिस्थितीत सहामाही परीक्षा देताना मुलांच्या मनाची काय स्थिती असेल याचा सरकारने विचार करून काही कृती तात्काळ करावी. हिंदी भाषा लादताना दाखवलेली चपळाई आणि आग्रहीपणा इथे पण दिसेल अशी अपेक्षा.
  • अशा आपत्तीनंतर रोगराई प्रचंड वाढते त्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग सतर्क राहील हे देखील सरकारने पहावं. जिल्हा रुग्णालयांपासून ते आरोग्य केंद्रांपर्यंत, सगळीकडे औषधांचा तुटवडा पडणार नाही हे सरकारने पहावं.
  • अशा संकटानंतर कर्जाच्या हप्त्यासाठी सुरु होणारा बँकांचा तगादा हा फारच तापदायक विषय असतो. एकतर बँकांना योग्य ती समज सरकारने आत्ताच द्यावी, अन्यथा आमचे महाराष्ट्र सैनिक ती देतीलच.

 

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here