प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशात बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी ‘ग्रेड’ आधारित ड्रायव्हिंग लायसन्स प्रणाली लागू करण्याची घोषणा केली आहे. नव्या प्रणालीअंतर्गत प्रत्येक वाहनचालकाला ठरावीक ‘पॉइंट्स’ दिले जातील. सिग्नल तोडणे, ओव्हरस्पीडिंग करणे, वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे यांसारख्या नियमभंग केल्यास हे पॉइंट्स कमी केले जातील. सर्व पॉइंट्स संपल्यास संबंधित चालकाचा परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित केला जाईल, तर गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणात परवाना कायमचा रद्द केला जाईल.
अपघातग्रस्तांसाठी ‘पीएम राहत योजना’ अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. अपघातानंतरच्या पहिल्या सात दिवसांचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. अपघातग्रस्तांना मदत करण्यास घाबरू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
देशातील अपघातांच्या आकडेवारीकडे लक्ष वेधताना गडकरी म्हणाले की, दरवर्षी सुमारे ५ लाख अपघात होतात आणि १.८ लाख लोकांचा मृत्यू होतो. मृतांपैकी ७२ टक्के तरुण १८ ते ४५ वयोगटातील आहेत. १८ वर्षांखालील मृतांची संख्या १०,११९ आहे. हेल्मेट न वापरल्याने ५४ हजार, तर सीटबेल्ट न लावल्याने १४ हजार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली.






