अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर अधिक शुल्क लादण्याचा इशारा दिला आहे. १ ऑगस्ट २०२५ या टॅरिफ डेडलाइनच्या फक्त दोन दिवस आधी त्यांनी हे वक्तव्य करून दोन्ही देशांतील व्यापार कराराच्या अनिश्चिततेला गती दिली आहे.
“भारत हा आमचा चांगला मित्र आहे,” असे ट्रम्प यांनी सांगितले. मात्र, त्याचवेळी त्यांनी भारतावर इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत अधिक शुल्क आकारल्याचे ही सांगितले.. भारताने अमेरिकेवर जास्त शुल्क लादले आहे आणि आता आपण (ट्रम्प) पुन्हा पदभार स्वीकारत असल्याने हे थांबेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
पत्रकारांनी विचारलेल्या ” भारतावर २० ते २५ टक्के शुल्क आकारले जाईल का ?” या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, ” होय, मला तसे वाटते.” त्यांच्या या वक्तव्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध पुन्हा एकदा नव्या वळणावर पोहोचले आहेत.
ट्रम्प यांनी यावेळी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधीचे श्रेय स्वतःकडे घेतले. “भारत माझा चांगला मित्र आहे. त्यांनी माझ्या विनंतीवरून पाकिस्तानबरोबरचे युद्ध थांबवले. मात्र, भारतासोबतचा व्यापारी करार अद्याप अंतिम झालेला नाही,” असेही त्यांनी नमूद केले.
गेल्या काही आठवड्यांपासून ट्रम्प प्रशासन सात-एक बिंदूंवर भारतासोबत व्यापारी करार करत असल्याचा दावा करत आहे. तरीसुद्धा १ ऑगस्टच्या डेडलाइनपूर्वी कोणताही अंतिम करार जाहीर होण्याची शक्यता नसल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली नाही. अमेरिकेकडून भारतातील कृषी आणि डेअरी क्षेत्र खुलं करण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर १ ऑगस्टपासून २५ टक्के व्यापार शुल्क आणि दंड द्यावा लागेल, असं म्हटलं आहे.