spot_img
शुक्रवार, नोव्हेंबर 7, 2025

9049065657

Homeकलाव्यापक सामाजिक भान जपणारा दिग्दर्शक : डॉ. जब्बार पटेल

व्यापक सामाजिक भान जपणारा दिग्दर्शक : डॉ. जब्बार पटेल

.कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क

मला कुणाचं बोट धरून नाही चालायचं… ही संस्था स्वच्छ ठेवायची आहे, आणि त्यासाठी मला जर कुणाशीही भिडावं लागलं, तरी मी भिडेन.”

हा संवाद आहे, जेष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या उंबरठा चित्रपटातील. सुलभा संस्थेतील भ्रष्टाचार, राजकारण आणि व्यवस्थेतील ढिसाळपणा याला सामोरी जाते आणि ती तिच्या मूल्यांशी तडजोड न करता संघर्ष करते. हे दृश्य  इतके प्रभावी आहे की, यातून महिलांच्यात मानसिक उर्जा निर्माण होते. डॉ. जब्बार पटेल हे मराठी नाट्य व चित्रपट सृष्टीतील एक प्रभावशाली, प्रयोगशील व सामाजिकदृष्ट्या जागरूक दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. डॉ. जब्बार पटेल हे एक प्रख्यात मराठी रंगकर्मी, चित्रपट दिग्दर्शक आणि वैद्यकीय व्यावसायिक आहेत. त्यांनी मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये अनेक महत्त्वाचे सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक चित्रपट निर्माण केले आहेत. त्यांची कारकीर्द वैद्यकीय पेशावरून सुरुवात होऊन रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीकडे वळली. त्याच्या या कार्याची दखल घेऊन डॉ. जब्बार पटेल यांना यावर्षीचा राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर झाला. यानिमित्त त्यांच्या प्रभावी कार्याविषयी…

डॉ. पटेल यांचे चित्रपट व नाटके सामाजिक विषमता, अन्याय, राजकीय भ्रष्टाचार आणि दलित-वंचितांच्या समस्या यावर आधारित आहेत. सिंहासन, उंबरठा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे चित्रपट समाजातील वास्तवाला भिडणारे आहेत. त्यांच्या दिग्दर्शनामध्ये नेहमीच राजकीय परिप्रेक्ष्य दिसतो. सिंहासन चित्रपटात महाराष्ट्रातील राजकारणातील सत्तासंघर्षाचे जिवंत चित्रण केले आहे. त्यांनी रंगभूमीवर सुद्धा अशा विषयांना वाचा फोडली. त्यांनी नाटक आणि चित्रपट माध्यमात पारंपरिक साच्यातून बाहेर पडून नवीन शैली आणि रचना वापरली. घाशीराम कोतवाल नाटकात लोककला, लावणी, भारूड, तमाशा यांचा समन्वय करून एक अनोखा प्रयोग केला. डॉ. पटेल यांच्या कलाकृतींमध्ये व्यक्तिरेखांचा अभ्यास व विश्लेषण अतिशय सखोल आणि सूक्ष्म असतो. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित चरित्रपटात त्यांच्या विचारांची प्रगल्भता व संघर्ष उभा केला आहे. त्यांच्या चित्रपटांमध्ये सौंदर्यशास्त्राचा समतोल वापर असतो, परंतु वास्तवाचे भान विसरलेले नसते. दृश्यरचना, संवाद आणि पार्श्वसंगीत हे सुद्धा विषयाच्या गंभीरतेशी सुसंगत असतात. त्यांचे अनेक प्रयोग हे नाटक मंडळांसोबत सामूहिक स्वरूपात झालेले आहेत. त्यांनी नेहमीच कलाकारांचा सर्जनशील सहभाग घेतला. डॉ. पटेल हे मूळचे डॉक्टर असल्यामुळे त्यांच्या दृष्टीकोनात चिकित्सकता आणि विवेकशीलता आढळते. त्यामुळे ते विषयाच्या मुळाशी जातात, तपशीलवार संशोधन करतात.

१९८२ साली प्रदर्शित झालेला उंबरठा हा एक अत्यंत प्रभावशाली आणि स्त्री-प्रधान मराठी चित्रपट आहे. मुख्य भूमिका स्मिता पाटील यांनी साकारलेली असून, त्यात एक समाजसेविका (सुलभा महाजन) म्हणून त्यांनी घरातील चौकट ओलांडून बाह्य समाजात न्यायासाठी लढा देणाऱ्या स्त्रीची भूमिका निभावली आहे.

अखेरीस सुलभा तिच्या वैयक्तिक आयुष्याचा त्याग करत संस्थेच्या व्रताला वाहून घेते. ती घर सोडते, पण आत्मविश्वासाने.

उंबरठा मी पार केलाय… आता परत मागे फिरणं नाही…

हा संवाद चित्रपटाचा सार सांगतो – स्त्रीने समाजात स्वतःची स्वतंत्र ओळख मिळवण्यासाठी केलेला ‘उंबरठा’ पार करण्याचा प्रवास. “उंबरठा” चित्रपट हे केवळ स्त्री-स्वातंत्र्याचे नव्हे तर सामाजिक कार्यातील सत्तेची, भ्रष्टाचाराची आणि मूल्यांच्या संघर्षाची एक प्रगल्भ मांडणी आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन, अभिनय आणि संवाद आजही प्रेरणादायी मानले जातात.

 जब्बार पटेल यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपटही गाजला.  बहुतेक समीक्षक आणि रसिकांच्या मते “डॉ. बाबासाहेब आंबेडकर” हा त्यांचा सर्वात श्रेष्ठ चित्रपट मानला जातो.

हा चित्रपट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटात त्यांनी आंबेडकरांच्या संघर्षाचे, विचारांचे आणि परिवर्तनशीलतेचे प्रभावी चित्रण केले आहे. या चित्रपटातील महाड सत्याग्रहाचे दृश्य हे दृश्य अत्यंत भावनिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. आंबेडकरांनी अस्पृश्यांना पाण्याच्या टाकीवर हक्क मिळावा म्हणून लढा दिला होता. या दृश्यात आंबेडकर म्हणतात,

“आम्ही माणूस म्हणून पाणी प्यायला आलो आहोत, धर्मभ्रष्ट होण्यासाठी नाही!”

या प्रसंगात डॉ. आंबेडकरांचे आत्मसन्मान, सत्याग्रह आणि समतेसाठीचा लढा उत्कटतेने मांडला आहे.

जब्बार पटेल पेशाने बालरोगतज्ज्ञ होते. वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच त्यांना नाटकांची आवड निर्माण झाली. पुण्यात एमबीबीएस करत असताना ते अनेक नाट्यचळवळींत सहभागी झाले. त्यांनी पुण्यातील ‘प्रोग्रेसिव्ह ड्रॅमेटिक असोसिएशन’ या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून रंगभूमीत प्रवेश केला. ही संस्था डाव्या विचारसरणीवर आधारित होती. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक राजकीय आणि सामाजिक विषयांवरील नाटकांचे दिग्दर्शन केले. विजय तेंडुलकर लिखित ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाच्या दिग्दर्शनाने जब्बार पटेल यांना संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभर प्रसिद्धी मिळवून दिली. हे नाटक केवळ राजकीय आशयामुळेच नव्हे, तर त्याच्या प्रयोगात्मक मांडणीमुळेही चर्चेत राहिले. यात पारंपरिक तमाशा आणि आधुनिक रंगमंचाचा संगम होता. नाटकांमधून आलेला अनुभव आणि सामाजिक जाणिवांमुळे त्यांनी चित्रपट माध्यमाकडे वळण्याचा निर्णय घेतला. सामाजिक अन्यायावर आधारित असलेला १९७५ साली प्रदर्शित झालेला समाना हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यानंतर ‘जैत रे जैत’, ‘सिंहासन’, ‘उंबरठा’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले.

जब्बार पटेल हे केवळ कलावंत नाहीत तर ते एक व्यापक सामाजिक भान जपणारे दिग्दर्शक आहेत. त्यांचे विषय स्त्री-विमर्श, दलित संघर्ष, सत्तेची व्याप्ती, इत्यादी मुद्द्यांभोवती फिरत असतात. पटेल यांचे दिग्दर्शन म्हणजे कलात्मकतेचा, सामाजिक जाणीवेचा, आणि प्रयोगशीलतेचा त्रिवेणी संगम आहे. त्यांनी मराठी रंगभूमी आणि चित्रपटांना एक नवी दिशा दिली असून त्यांचे योगदान हे प्रेरणादायक आहे.

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments