
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
खमंग सुटलेला वास… कढईत खरपूस तळत असलेले बटाटेवडे…वडे चांगले भाजण्यासाठी मालवाला कढईत झारीने करत असलेली कच्च्या वड्यांची उलथापालथ…! हे पाहत असताना कुणाच्या तोंडाला पाणी सुटणार नाही बरे! बटाटावडा हा महाराष्ट्रात कुठेही अगदी केव्हाही मिळणारा आणि विशेष म्हणजे सर्वांच्या आवडीचा पदार्थ. बटाटावड्याच्या खमंग वासाची आज आठवण यायचे कारण म्हणजे आज २३ ऑगस्ट असून आजचा दिवस जागतिक वडापाव दिन म्हणून साजरा केला जातो.
बटाटावडा कमी वेळेत तयार होणारा चटपटीत पदार्थ आहे. वड्यातील बटाटे, बेसन, पाव या घटक पदार्थामुळे भूक कांही वेळ तग धरते. खायला खमंग आणि भूकही भागविणारा बटाटावडा असल्यामुळे फार कमी कालावधीत लोकप्रिय झाला आहे.
अशोक वैद्य नावाच्या व्यक्तीने १९६६ च्या सुमारास मुंबईच्या दादर स्टेशनबाहेर पहिल्यांदा वडापाव विकायला सुरुवात केली. त्याची संकल्पना म्हणजे कामावर जाणाऱ्या माणसाला पटकन आणि स्वस्तात मिळणारा खाऊ उपलब्ध करून देणे. ही कल्पना इतकी लोकप्रिय झाली की आज वडापाव मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रात एक भावनिक आणि खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनली आहे.
वडापाव हे एक लोकप्रिय महाराष्ट्रीयन फास्ट फूड होय. प्रथम कांदा, लसून, मिरच्या, गरम मसाला घालून उकडलेल्या बटाटयाची भाजी केली जाते. या भाजीचे लहान लहान गोलाकार स्लाईस तयार केल्या जातात. या स्लाईस साधारण पातळ बेसनपीठात बुडवून खरपूस तळ्ल्या जातात. तयार झालेला वडा पावसोबत खाल्ला जातो.
प्रारंभी मुंबईतील रस्त्यांवर आणि स्टेशनजवळ सहज मिळणारा आणि स्वस्त, चवदार खाऊ म्हणून ओळखला जाणारा वडापाव हे महाराष्ट्राचे “देशी बर्गर” म्हणून प्रसिद्ध झाला आहे. आता वडापाव सर्वत्र मिळतो. वडापावचा सन्मान करण्यासाठी आणि त्याच्या सांस्कृतिक महत्त्वाची जाणीव लोकांना करून देण्यासाठी २३ ऑगस्ट रोजी ‘वडापाव दिन’ साजरा केला जातो.
तीसेक वर्षापूर्वी बटाटावडा हातात मावत नव्हता, इतका मोठा असायचा. यामुळे सकाळी वडा खाल्ला की, दुपारी तीन-चार वाजेपर्यंतभूक लागायची नाही. हळूहळू बटाटावड्याचा आकार लहान होत आला. मात्र कोल्हापुरात मिळणाऱ्या बटाटावड्याचा आकार किमान आहे. बॉम्बे वड्याचा आकार मात्र आहे तितकाच लहानसा आहे. मजेशीर बाब म्हणजे बॉम्बे वड्याच्या लहान आकारामुळे आणि कमी किमतीत मिळत असल्यामुळे हा वडा जास्त लोकप्रिय झाला आहे. वड्यासोबत काही ठिकाणी खोबऱ्याची पातळ चटणी दिली जाते. काही ठिकाणी वड्यासोबत कढीही दिली जाते. चटणीसोबत किवा कढीसोबत वडापाव खाण्यात मजा वेगळीच. आणखी तळून मीठ लावलेली मिरची असेल तर मग काय बोलायचे कामच नाही!
———————————————————————————————–
Be the first to write a review