प्रसारमाध्यम प्रतिनिधी:
काँग्रेसचे माजी खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी दावा केला आहे की 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव केवळ जनतेतील नाराजीमुळे झाला नाही, तर त्यामागे CIA आणि मोसादचा प्रभाव होता. संविधान दिनानिमित्त आयोजित काँग्रेसच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
केतकर यांच्या मते 2004 ते 2009 या काळात काँग्रेसच्या जागा वाढत होत्या आणि 2014 मध्ये पक्षाला 250 जागा मिळू शकल्या असत्या. मात्र काही विदेशी संस्थांनी काँग्रेसला खाली खेचण्यासाठी रणनीती आखली आणि प्रत्येक मतदारसंघाचा बारकाईने अभ्यास करून पक्षाला कमकुवत केले, असा त्यांचा आरोप आहे.
ते म्हणाले, “काँग्रेस २०६ वरून थेट ४४ जागांवर कशी काय येऊ शकते? याच्यावर माझाच काय कुणाचाच विश्वास बसत नाही. हे काय फक्त जनमतामुळे आलेला नाही. काँग्रेसच्या विरोधात असंतोष, नाराजी होती. डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या विरोधात नाराजी होती. पण म्हणून २०६ चा आकडा ४४ वर जाईल, अशी काही परिस्थिती नव्हती. काँग्रेसला २०६ वरून खाली खेचल्याशिवाय आपल्याला इथे डावपेच खेळता येणार नाहीत. हे समजून वागणाऱ्या ज्या काही संस्था होत्या, त्यात एक होती सीआयए आणि दुसरी संस्था होती मोसाद. काँग्रेस किंवा काँग्रेस आघाडीचे सरकार भारतात आल्यास आपल्याला काहीच करता येणार नाही, असा काही संस्थांचा अंदाज होता.”
मोसादने याचे संपूर्ण स्ट्रक्चर तयार केले. मोसादने बारकाईने निवडणुकीचा आणि प्रत्येक मतदारसंघाचा अभ्यास केला. आपल्या स्वतःला अनुकूल असलेले सरकार भारतात आल्यास ते आपल्या ताब्यात राहिल. त्यामुळे काँग्रेसप्रणित सरकारला आघाडी नको, असा प्रयत्न झाला. मतदारसंघांचा बारीकसारीक तपशीलही या संस्थांकडे आहे.






