कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सध्या सुरू असून, आजच्या दिवसात राज्याच्या राजकारणासाठी महत्वाच्या घडामोडी घडणार आहेत. अधिवेशनानंतर आज संध्याकाळी ६ वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी ४.३० वाजता सर्व गिरणी कामगार संघटनांसोबत महत्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीकडे कामगार संघटनांचं तसेच सर्वसामान्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. गेल्या काही आठवड्यांपासून गिरणी कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडले असून, त्या आंदोलनाला राजकीय रंगही चढला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या सक्रिय सहभागामुळे या आंदोलनाला अधिकच धार मिळाली होती.
आजच्या बैठकीत मुख्यमंत्री थेट गिरणी कामगार संघटनांचे प्रतिनिधींसोबत संवाद साधणार असून, कामगारांच्या मागण्यांवर काही सकारात्मक तोडगा निघतो का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारकडून काही महत्त्वाचे आश्वासने दिली जाऊ शकतात, अशी शक्यता आहे.
राजकीय वातावरण तापलेले असताना, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या बैठकीकडे राज्यभरातील गिरणी कामगारांच्या कुटुंबीयांचे आणि जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.



