कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना आज अन्न आणि नागरी पुरवठा खातं जाहीर करण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांनी मार्चमध्ये आपल्या अन्न आणि नागरी पुरवठा या खात्याचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रिक्त झालेलं हे खातं भुजबळांना सोपावण्यात आलं आहे.
छगन भुजबळ यांनी २० मे रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. याआधी सरकारमध्ये असताना भुजबळांकडे हेच खातं होतं. त्यानंतर आता पुन्हा हेच खातं त्यांना अधिकृतरित्या देण्यात आलं आहे.
धनंजय मुंडे यांनी मार्च महिन्यात त्यांच्या खात्याचा राजीनामा दिला होता. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर समाजमाध्यमांवर त्यांच्या मारहाणीचे अतिशय भयंकर फोटो समोर आले होते. या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. अखेर मुंडेंनी त्यांच्या अन्न आणि नागरी पुरवठा या खात्याचा राजीनामा दिला होता. त्यांनी त्यांच्या पीएकडून आपला राजीनामा पाठवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारला.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख म्हणून अजित पवार यांनी हे खातं त्यांच्याकडे ठेवलं होतं. मात्र आता छगन भुजबळ यांना हे खातं सोपावण्यात आलं आहे. दरम्यान, बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. त्यानंतर धनंजय मुंडेंनी जवळपास अडीच महिन्यांनी राजीनामा दिला होता.



