अहिल्यानगर : प्रसारमाध्यम न्यूज
अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी येथे राज्य मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या ऐतिहासिक राज्य मंत्रिपरिषद बैठकीनंतर पत्रकार परिषद संपन्न झाली. या बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या त्रिशताब्दीनिमित्त विविध विकास कामांचे निर्णय घेण्यात आले.
परकीयांच्या आक्रमणामुळे संपूर्ण भारतामधली श्रद्धास्थाने नष्ट करण्यात आली होती, त्याचे पुनर्जीवन करण्याचं काम अहिल्यादेवींनी केली. म्हणूनच आज या मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी चौंडीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळ संवर्धन करण्याकरता ६८१ कोटी रुपयांचा आराखडा स्वीकार केला आहे. यातून विविध प्रकारची कामे या ठिकाणी होतील आणि अखिल भारतीय स्तरावरचं एक प्रेरणास्थान म्हणून तयार झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न सरकार करणार आहे, असे फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीसांच्या दहा मोठ्या घोषणा –
- पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जीवनकार्य जगाला करून देण्यासाठी बहुभाषिक चित्रपट निर्माण करण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- अहिल्यानगरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय वैद्यकीय कॉलेज उभारणार
- अहिल्यानगरमध्ये खास मुलींसाठी आयटीआय
- मुलींसाठी आदिशक्ती अभियान राबविणार
- महिलांना आदिशक्ती पुरस्कार देणार
- धनगर समजतील विद्यार्थ्यांना इंग्रजीत शिकण्यासाठी यशवंत विद्यार्थी योजना, एकूण दहा हजार विद्यार्थ्यांना मिळणार शिक्षणाचा लाभ
- धनगर समाजातील मॅट्रिकमधील गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना, पुणे आणि नागपूरला काम सुरू होणार
- पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी उभारलेल्या विहीर पुनरुज्जीवनचा कार्यक्रम हाती घेणार, चांदवड, त्र्यंबकेश्वर व इतर काही ठिकाणी संवर्धन करणार
- राहुरी येथे वरिष्ठ स्तरावरील दिवाणी न्यायालय उभारणाररक विद्यार्थ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना, पुणे आणि नागपूरला काम सुरू होणार
- नाशिक व त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण कायदा संमत
मंदिरांच्या विकास आराखड्यासाठी ५५०३ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मान्यता –
श्री क्षेत्र महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा १४४५ कोटी रुपये, श्री क्षेत्र माहूरगड विकास आराखडा ८२९ कोटी रुपये, तुळजाभवानी मंदिर आराखडा १८६५ कोटी, ज्योतिबा मंदिर २५९ कोटी, महालक्ष्मी मंदिर १४४५ कोटी मंजुरी, त्र्यंबकेश्वर २७५ कोटी देण्यात येणार आहे. जवळपास ५५०३ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मान्यता दिलेली आहे. जे कार्य देशांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलं तेच कार्य त्यांच्यातील शताब्दीच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही करत आहोत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
———————————————————————————————