प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
राज्यातील हवामानात पुन्हा मोठे बदल होत असल्याचे दिसत आहे. उष्णतेचा पारा वाढलेला असतानाच भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांसाठी अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये वातावरण अस्थिर राहणार आहे. काही ठिकाणी उष्णतेची लाट तर काही भागांमध्ये अचानक पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज
शनिवारी लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. तसेच यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
रविवारी नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांतील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दरम्यान जोरदार वाऱ्यांचाही इशारा देण्यात आला आहे.
याशिवाय पुणे, नांदेड, बीड आणि परभणी या जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कोकणात उष्ण आणि दमट हवामान
दरम्यान मुंबईसह कोकणातील जिल्ह्यांमध्ये उष्णता आणि दमट वातावरणात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पालघर, रायगड आणि मुंबई या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नागरिकांनी शक्यतो दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे तसेच उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
तापमानात मोठी चढउतार
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 39 ते 40 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचला आहे. मंगळवारी अमरावती, वाशिम, ब्रह्मपुरी, सोलापूर, जळगाव आणि यवतमाळ येथे 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
राज्यातील नीचांकी तापमान नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे 12.2 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले.
त्यामुळे उष्णता आणि अवकाळी पावसाचा दुहेरी परिणाम राज्यातील हवामानावर दिसत असून पुढील काही दिवस नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





