कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
काबाडकष्ट करून मुलांना मोठे केले. पण, आईचा सांभाळ करण्याऐवजी ज्यांना हाताच्या फोडा प्रमाणे वाढवलं त्या दोन्ही मुलांनीच घराबाहेर काढले. राहायचं कुठे, खायचं काय… असा सवाल करत न्यायासाठी मंगळवारी एका ७० वर्षीय वृद्ध मातेने जिल्हाधिकार्यांच्या दालनासमोर टाहो फोडला.
कोल्हापूर जिल्ह्यातील एका ७० वर्षीय वृद्ध मातेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्यायासाठी टाहो फोडला. राहण्यासाठी ठिकाण आणि खाण्यासाठी अन्न नसल्याने ती न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली.
या घटनेने वृद्धांच्या हक्कांच्या संरक्षणाची आणि मुलांच्या जबाबदारीची गंभीर बाब समोर आणली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी अशा प्रकारच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस निर्णय घेतले आहेत. उदाहरणार्थ, जर कुटुंबातील वृद्ध सदस्यांचा योग्य सांभाळ केला जात नसेल, तर त्या कुटुंबाला सरकारी लाभ मिळणार नाही, असा ठराव काही ग्रामपंचायतींनी घेतला आहे. या घटनेला सामाजिक माध्यमांवरूनही मोठा प्रतिसाद मिळाला आहे. लोकांनी या वृद्ध मातेच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली असून, अशा घटनांवर कठोर कारवाईची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना भेटून या वृद्धेने आपली कैफियत मांडली. चांगले घर आहे. त्यात दोन मुले आपल्या पत्नी, मुलांसह राहतात. आपण मात्र घरामागील पडीक जागेत राहतो. मिळेल ती मजुरी करतो. त्यातून जे मिळते त्यावर गुजराण करतो. पण मुलांना दया येत नाहीच. आता पाऊस सुरू होईल, यामुळे राहायचे कुठे हा प्रश्न आहे. मुलगा साठ हजार रुपये घे आणि बाहेर हो, असे सांगतो, साहेब मी कुठे जाऊ, काय खाऊ, असे सांगताच येडगे यांनी तत्काळ करवीर प्रांताधिकार्यांना ज्येष्ठ नागरिक कायद्यान्वये या महिलेचा अर्ज दाखल करून घेण्यास सांगितले. यानंतर सर्वसाधारण शाखेचे तहसीलदार विजय पवार यांनी श्रावणबाळ योजनेतून या महिलेला अनुदान सुरू करण्याबाबतची कार्यवाही सुरू केली. यानंतर वृद्धा आभार मानून गावी परतली.
———————————————————————————————–