कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
छत्रपती संभाजीनगर छावणी येथील बालगृहात अलीकडेच घडलेल्या दुर्दैवी व संवेदनशील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील बालगृहांची सद्यस्थिती, आवश्यक सुधारणा आणि उपाययोजनांबाबत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय, चित्रा वाघ, प्रज्ञा सातव तसेच महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, सहआयुक्त राहुल मोरे आदी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान राज्यातील सर्व शासकीय आणि खाजगी बालगृहांची सखोल पाहणी करण्यात येणार असल्याचे ठरवण्यात आले. बालकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी यंत्रणा उभारणे, मनोवैज्ञानिक मदत उपलब्ध करून देणे, तसेच बालगृहांच्या व्यवस्थापनामध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्यावर भर देण्यात आला.
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले की, “बालगृहातील मुलांचे संरक्षण व पुनर्वसन हे केवळ प्रशासकीय जबाबदारी नाही, तर सामाजिक बांधिलकी आहे. या संदर्भात गंभीरतेने आणि तातडीने उपाययोजना राबवणे आवश्यक आहे.”
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनीही खात्याच्या वतीने तत्परतेने कारवाई केली जाईल, तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
या बैठकीतून राज्य शासनाने बालकांच्या सुरक्षेसाठी अधिक जागरूकता, दक्षता आणि कठोर नियंत्रण यावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे.
————————————————————————————————-