spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeअध्यात्मअंबाबाई नवरात्रोत्सवास विधिवत प्रारंभ

अंबाबाई नवरात्रोत्सवास विधिवत प्रारंभ

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

दुष्ट प्रवृत्तींचा संहार करून भक्तांवर कृपादृष्टी ठेवणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवाला सोमवारी ( दि.२३ ) पहाटे मंत्रोच्चार, पारंपरिक तालवाद्यांचा गजर आणि तोफेच्या सलामीतून विधिवत घटस्थापनेने प्रारंभ झाला. देशातील ५१ शक्तिपीठांपैकी व महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या या पूर्णपीठात मागील दोन दिवसांपासून भाविकांचा उत्साह उसळला आहे.

उत्सवाच्या पूर्वसंध्येला दुर्गाज्योत नेण्यासाठी विविध राज्यांतून आलेल्या भाविकांच्या ‘उदं गं अंबे’ या गजराने मंदिर परिसर दुमदुमून गेला. यंदाचा नवरात्रोत्सव दहा दिवसांचा असल्याने मांगल्याचे हे पर्व अनुभवण्यासाठी भाविक आतुर झाले आहेत.

सकाळी ७.३० वाजता श्रीपूजक मुनीश्वरांच्या हस्ते मुख्य गाभाऱ्यात मंत्रोच्चार आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर घटस्थापना पार पडली. सकाळी साडेसहा, साडेआठ व साडेअकरा वाजता देवीला नित्याभिषेक करण्यात आला. सकाळी ९ वाजता मानकरी जाधव घराण्याकडून तोफेची सलामी देण्यात आली आणि त्यानंतर शासकीय पूजेनं नवरात्रोत्सवाची अधिकृत सुरुवात झाली.
करवीर निवासिनी श्री अंबाबाई महालक्ष्मी मंदिरात तोफेची सलामी झाल्यावर श्रीची उत्सवमुर्ती घटासमोर विराजमान झाली घटस्थापना होऊन शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला

दुपारी दोन वाजता अंबाबाईची कमलादेवी रूपातील जडावी अलंकार पूजा बांधण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत दररोज रात्री साडेनऊ वाजता अंबाबाईची फुलांनी सजवलेली पालखी गरुड मंडपातून मंदिर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडणार आहे. ललिता पंचमीला अंबाबाई-त्र्यंबोली भेटीचा सोहळा तर अष्टमीला नगर प्रदक्षिणा होणार आहे.

जोतिबाची आजची पूजा
यमाई देवीची आजची पूजा

श्री क्षेत्र जोतिबा गडावर आज घटस्थापना निमित्त भक्तांच्या  जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. “चांगभलं जी” या पारंपरिक घोषणांनी गडावर उत्साहाची लहर पसरली होती. सकाळी लवकरच श्री जोतिबा व यमाई देवीची मंत्रोच्चारात मनमोहक पूजा पार पडली. ढोल-ताशांच्या गजरात, गुलालाच्या उधळणीत आणि भक्तांच्या ओवाळ्यांच्या मंगलध्वनीत देवस्थान परिसर पवित्र ऊर्जा व आध्यात्मिक आनंदाने भारून गेला.

मुखदर्शनाची नवीन व्यवस्था : यंदा शारदीय नवरात्रोत्सवात भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने पितळी उंबऱ्याच्या बाहेरूनच देवीचे दर्शन देण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. गणपती चौक व गरुड मंडपाच्या महाव्दार बाजूने तात्पुरता जिना उभा करून दोन ठिकाणी मुखदर्शनाची सोय केली जाणार आहे.
त्र्यंबोली भेटीतील शिस्त व सुरक्षा : पालखीच्या स्वागतावेळी होणारी हुल्लडबाजी टाळावी, तसेच परतीच्या वेळीही पोलिस बंदोबस्त असावा, अशी मागणी श्रीपूजक मंडळाने केली. गेल्या वर्षी हुल्लडबाजीमुळे मानकरी व सेवेकऱ्यांना धक्काबुक्की झाली होती.
भाविकांची सुविधा व सुरक्षारक्षकांना सूचना : गरुड मंडपातील उभारणी तात्पुरती थांबवून अभिषेक व पालखी सोहळा सुरळीत पार पडणार आहे. भाविकांसाठी शेड, जिना आदी व्यवस्था करण्यात येणार असून सुरक्षारक्षकांना सौजन्याने वागण्याच्या सूचना देण्यात आल्या.
लाखो भाविकांच्या गर्दीचा अंदाज लक्षात घेऊन देवस्थान समिती कडून सुरक्षेची विशेष व्यवस्था, पाणीपुरवठा, वैद्यकीय सेवा आणि रांग व्यवस्थापन यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसर रोषणाई, फुलांची सजावट आणि पारंपरिक देखाव्यांनी मंगलमय वातावरणाने उजळून निघाला आहे.
———————————————————————————————————————-
RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments