पालखी सोहळा पंढरपुरा जाई | भक्तजन घेता नाम गाई ||

0
170
Palkhi chariot of Saint Tukaram Maharaj
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज 

महाराष्ट्राची व्याख्या करताना वारीला आणि संताना वगळून व्याख्या करता येणार नाही. वारी ही खूप जुनी परंपरा आहे. परंतु पालखी ही वारीसारखी जुनी परंपरा नाही. पालख्या संताच्या पादुका घेऊन पंढरपूरला जातात. १६८५ मध्ये तुकाराम महाराजांचे तिसरे चिरंजीव नारायण महाराज यांनी प्रथम पालखी सोहळा सुरु केला.

जगदगुरु नारायण महाराज यांनी सुरु केलेला पालखी सोहळा म्हणजे वारीचा टर्निंग पाईंट म्हणता येईल. त्यांनी वेगवेगळ्या गावावरुन जाणाऱ्या सर्व दिंड्या एकत्र केल्या आणि तुकाराम महाराजांच्या पादुका घेतल्या. तसेच ज्ञानेश्वर महाराजांच्याही पादुका घेतल्या. त्या दोन्ही पादुका घेऊन पालखी पंढरपूरकडे निघाली. त्या वेळी तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका गळ्यात घालून नेल्या जात होत्या. दोन्ही पादुका एकाच पालखीत जाऊ लागल्या. त्यामुळेच ज्ञानोबा-तुकोबा हे भजन सुरु झाले. 

१६८५ पासून १४७ वर्षे या पद्धतीने पंढरपूरला पालखी जात होती. त्यानंतर १८३२ मध्ये दोन्ही पालखी सोहळे विभक्त झाले. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही पादुका वेगवेगळ्या पालखीतून वेगवेगळ्या मार्गाने जावू लागल्या. आषाढी वारीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो संतांच्या-सत्पुरुषांच्या पालख्या आता पंढरीस येतात.

 महाराष्ट्रातून निघणाऱ्या महत्वाच्या पालख्या –

राज्यभरातून २०० ते २५० पालख्या पंढरपूरला जातात. अनेक पालख्यांना संतांची नावे आहेत. पालख्यांसोबत चार ते पाच लाख वारकरी पायी पंढरपूरला जातात.

संत निवृत्तीनाथांचा पालखी सोहळा : संत ज्ञानेश्वर यांचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ. ते ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु आहेत. त्यांनी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे समाधी घेतली. त्यांच्या समाधी मंदिरातून पालखी निघते.

संत सोपनकाका पालखी सोहळा : संत ज्ञानेश्वर यांचे लहान बंधू सोपानदेव यांनी सासवड (जि. पुणे) येथे समाधी घेतली होती. त्यांच्या नावाने सासवड येथील समाधी मंदिरातून पालखी निघते.
श्री संत मुक्ताई पालखी सोहळा : संत ज्ञानेश्वर यांची बहीण संत मुक्ताई. जळगाव जिल्ह्यातील कोथळी (ता.मुक्ताईनगर) हे त्यांचे समाधीस्थळ. त्या ठिकाणावरुन संत मुक्ताई यांची पालखी निघते. या पालखीतील वारकरी तब्बल ५६० किलो मीटरचा पायी प्रवास करतात. त्यासाठी त्यांना ३३ दिवस लागतात.
संत एकनाथांचा पालखी सोहळा : संत एकनाथांची पैठण (छत्रपती संभाजीनगर) येथे कर्मभूमी आहे. त्यांचे त्या ठिकाणी मंदिर आहे. त्या मंदिरातून संत एकनाथ यांची पालखी निघते.
संत गजानन महाराज यांची पालखी : शेगावचे संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा विदर्भातून निघतो. सलग ३१ दिवस पायी वाटचाल करत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरला येते.
संत ज्ञानेश्वर यांची पालखी : श्री क्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानेश्वर यांची समाधी. त्या ठिकाणावरुन संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी निघते.
संत तुकाराम महाराज यांची पालखी : देहू हे पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे आणि ते संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थानही आहे. आषाढी एकादशीच्या काही दिवस आधी तिथून संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करते.
————————————————————————————————–
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here