कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
‘कान’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चार मराठी चित्रपट जाणार असून यात ‘स्थळ’, ‘स्नो फ्लावर’ आणि ‘खालीद का शिवाजी’ यांचा समावेश असून जुनं फर्निचर या चित्रपटाचा खास गौरव होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली. महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी मराठी चित्रपटांची निवड झाली आहे.
फ्रान्समध्ये १४ ते २२ मे २०२५ या कालावधीत कान चित्रपट महोत्सव होणार आहे. या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यांना चार मराठी चित्रपट जाणार आहेत. महामंडळमार्फत २०१६ पासून कान महोत्सवातील फिल्म मार्केटमध्ये मराठी चित्रपट पाठवले जात आहे. या चित्रपट निवडीसाठी महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे तज्ञ परीक्षण समिती तयार केली होती. आदित्य सरपोतदार, निखिल महाजन, गणेश मतकरी, हिरावती कर्णिक व अपूर्वा शालिग्राम यांचा यात समावेश होता.
जुनं फर्निचर :
महेश मांजरेकर अभिनित आणि दिग्दर्शित ‘जुनं फर्निचर’ हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे. या चित्रपटात वृद्धापकाळ पोहोचल्यावर आपलीच मुले आपल्याला कशाप्रकारे नाकारतात आणि त्यामुळे होणारे हाल दाखवण्यात आले आहे. अभिनेता भूषण प्रधान या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. मेधा मांजरेकर, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकारी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोक्षे. यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहे.
स्थळ :
भारतातील ग्रामीण भागातील पारंपारिक विवाह व्यवस्थेवर भाष्य करणारा ‘स्थळ’ हा चित्रपट आहे. समाजात खोलवर रुजलेले पितृ सत्ताक पद्धत, रंगभेद आणि सामाजिक दृष्टिकोन अशा अनेक गोष्टीवर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे. सचिन बेळगावकर या चित्रपटाचे प्रस्तुत करते आहेत. अभिनेत्री नंदिनी चिकटे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. जयंत सोमलकर याने चित्रपटाची दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
खालीद का शिवाजी :
राज मोरे यांच्या ‘खालीद का शिवाजी’ या चित्रपटात खालीद हा मुलगा मुस्लिम धर्मीय असल्याने त्याला इतर मुले एकटे पाडतात. त्याचे निरागस डोळे मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा शोध घेतात, या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
स्नो फ्लावर :
‘स्नो फ्लावर’ हा मराठी चित्रपट रशिया आणि कोकण या दोन वेगळ्या संस्कृतीला जोडणारा आहे. बर्फाळ सायबेरिया आणि हिरवेगार कोकण यांच्या विरोधाभासी पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट आहे. गजेंद्र अहिरे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. विठ्ठल अहिरे, छाया कदम, वैभव मांगले आणि सरफराज आलम सफू हे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
————————————————————————————–