मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्यातील पोलिस भरती लांबणीवर गेल्याने तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. आधी कोरोना महामारी आणि त्यानंतर इतर काही अडथळ्यांमुळे भरती प्रक्रिया रखडली होती. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे वय भरतीसाठी निश्चित मर्यादेपेक्षा जास्त झाले होते. विविध संघटनांनी आणि तरुणांनी वयोमर्यादा वाढवण्याची मागणी लावून धरली होती. या मागणीकडे लक्ष देत राज्य सरकारने आता अशा उमेदवारांसाठी दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे.
गृह विभागाने १० सप्टेंबर २०२५ रोजी याबाबत शासन निर्णय जारी केला असून, २०२२ ते २०२५ दरम्यान वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांनाही अर्ज करण्याची संधी देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे शेकडो नव्हे तर हजारो तरुणांचे पोलीस दलात सेवा देण्याचे स्वप्न साकार होणार आहे.
सरकारचा पोलीस भरतीबाबतचा निर्णय
-
एकूण १५,६३१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
-
पदे शंभर टक्के भरण्यात येणार आहेत.
-
जानेवारी २०२४ पासूनची रिक्त पदे भरली जाणार आहेत.
-
वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही विशेष बाब म्हणून अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.
कोणत्या पदांसाठी भरती होणार
-
पोलीस शिपाई – १२,३९९ जागा
-
पोलीस शिपाई चालक – २३४ जागा
-
बँड्समन – २५ जागा
-
सशस्त्र पोलीस शिपाई – २,३९३ जागा
-
कारागृह शिपाई – ५८० जागा
-
एकूण – १५,६३१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.



