राज्य सरकार तर्फे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत सातवा हप्ता वितरित करण्याचा शासन निर्णय आज कृषी विभागाने निर्गमित केला आहे. लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
या हप्त्यामध्ये एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ या कालावधीतील अनुदानाचा समावेश असून, राज्यातील ९२ लाख ३६ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. यासाठी तब्बल १९३२.७२ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
केंद्र व राज्य सरकारचा संयुक्त लाभ
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत प्रति वर्षी ६ हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळते. त्यास राज्य शासनाने अतिरिक्त ६ हजार रुपये अनुदान देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविली आहे. त्यामुळे एकूण शेतकऱ्यांना दरवर्षी १२ हजार रुपयांचा दिलासा मिळतो.
आजवर या योजनेतून सहा हप्ते वितरित करण्यात आले असून सातवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “राज्यातील सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना समोर ठेऊन दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी सरकार काम करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबविली जाते. अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या शेतकरी बांधवांना या हप्त्याचा फायदा होणार आहे. तसेच बाधित पिकांचे पंचनामे अंतिम टप्यात असून लवकरच त्यांनाही मदत जाहीर होईल.”
या निर्णयामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आर्थिक हातभार मिळणार असून राज्य सरकारकडून दिलासा देण्याचा प्रयत्न सुरूच राहणार आहे.