मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
महाराष्ट्रात देशाच्या साठ टक्के डेटा सेंटर क्षमता उभारली गेली असून डिजिटल अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी ही पायाभूत सुविधा महत्त्वाची ठरणार आहे. राज्यात डेटा सेंटर, लॉजिस्टिक्स आणि इतर क्षेत्रांमध्ये तब्बल वीस हजार कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सिंगापूरस्थित तमासॅक कंपनीने मणिपाल ग्रुप विकत घेतल्यानंतर नागपूरमध्ये सुमारे ७०० कोटी रुपयांचे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यासाठी करार केला आहे. याशिवाय मेपल ट्री कंपनीसोबत ३,००० कोटी रुपयांच्या लॉजिस्टिक पार्क प्रकल्पासाठीही करार झाला आहे.
दरम्यान, जेएनपीटीमध्ये सिंगापूर पोर्ट अथॉरिटीने उभारलेल्या नवीन टर्मिनलचे काम पूर्ण झाले असून या टर्मिनलमुळे पोर्टची कंटेनर हाताळण्याची क्षमता दुपटीने वाढणार आहे. परिणामी, जेएनपीटी देशातील सर्वात मोठा कंटेनर हाताळणारा पोर्ट ठरणार आहे.
या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी सिंगापूरचे उपपंतप्रधान आणि महाराष्ट्रातील एका प्रतिनिधी मंडळाने प्रत्यक्ष भेट दिली. भारताचे पंतप्रधान आणि सिंगापूरचे पंतप्रधान लवकरच या नवीन टर्मिनलचे उद्घाटन करणार आहेत.
ही गुंतवणूक आणि प्रकल्प राज्याच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला मोठा हातभार लावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
————————————————————————————
Be the first to write a review