दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, अकरावी, डिप्लोमा आणि ‘आयटीआय’ प्रवेश प्रक्रिया वेग धरणार आहेत. येत्या आठवड्यात तिन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियामध्ये नोंदणी प्रकिया सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कागदपत्रे आणि दाखले काढून ठेवावे, अशी माहिती देण्यात आली आहे. दहावीच्या निकालात १.७१ टक्क्यांची घट झाल्याने यंदा प्रवेशासाठी फारशी अडचण येणार नाही. मात्र, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, अमरावती, कोल्हापूर येथील नामांकित संस्थेत प्रवेशासाठी चुरस राहणार आहे.
पॉलिटेक्निक प्रवेश १९पासून
राज्यातील डिप्लोमा इन इंजिनीअरिंग (पॉलिटेक्निक) प्रवेशांना दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सुरुवात होते. यंदा निकाल लवकर जाहीर झाला आहे. त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याच्या दिवशीच पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा मानस आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन सुरू आहे. राज्यात ३५० पॉलिटेक्निकमध्ये एक लाख सात हजार जागा प्रवेशासाठी आहेत. विद्यार्थी आणि पालकांनी माहितीसाठी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या (डीटीई) वेबसाइटवर संपर्क साधावा, असे आवाहन संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी केले आहे.



