करवीर निवासिनी अंबाबाईचा आज रथोत्सव

0
132
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

दख्खनचा राजा जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेनंतर कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाई आणि शिवछत्रपती व ताराराणी यांच्या रथोत्सवाची परंपरा आहे. त्यानुसार यंदाही रथोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शनिवारी जोतिबा यात्रेचा मुख्य दिवस होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवार (ता.१३) आज अंबाबाईच्या रथोत्सवाची नगर प्रदर्शना होणार आहे. तर सोमवारी (ता.१४) शिवछत्रपती व ताराराणी रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही रथोत्सवांची सुरुवात रात्री नऊ वाजता होईल.

करवीर निवासिनी अंबाबाईच्या रथोत्सवाची जय्यत तयारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे तर शिवछत्रपती व ताराराणी यांच्या रथोत्सवाची तयारी छत्रपती चारिटेबल देवस्थान ट्रस्ट तर्फे करण्यात आली आहे. या दोन्ही रथोत्सवाच्या निमित्ताने महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्ट, न्यू गुजरी मित्र मंडळ, मावळा कोल्हापूर, बालगोपाल तालीम, सराफ संघ, शाहू मॅरेथॉन, फेरीवाला संघटना महाद्वार रोड, व्यापारी व रहिवासी संघटना यासह तालीम संस्था, तरुण मंडळ यांच्या वतीने विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन केले आहे.

रथोत्सवाच्या निमित्त महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्टच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे महाद्वार चौक ते जोतिबा रोड मार्गावर आकर्षक रोशनाई व नेत्रदीपक आतशबाजी करण्यात येणार आहे. यात ८०, कॅनेटिक कॉल, 90 फूट ट्रस्ट, एम. आय. बारलाईट, ब्लेडर लाईट, एलईडी लाईट, स्मोक मशीन व इतर लाईटचे आकर्षण असणार आहे.

याशिवाय महालक्ष्मी भक्त मंडळ महालक्ष्मी अन्नछत्र तर्फे ज्योतिबा यात्रा करुसाठी मोफत झुणका भाकर उपक्रम राबविण्यात येणार आहे. रविवार (ता.१३) रोजी सकाळी ११ वाजता अंबाबाई मंदिर परिसरातील रामाचा पार येथे देवस्थान समितीचे सचिन शिवराज नायकवडे व अंबाबाई मंदिराचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्या हस्ते उपक्रमाचा प्रारंभ होईल. अंबाबाई रथोत्सव मार्गावर कोल्हापूरसह मुंबई, पुणे, सांगली येथील कलाकार रांगोळी रेखाटनार आहे. या कलाकारांना गुजरी मित्रमंडळाच्या वतीने पंधराशे किलो संस्कार भारतीची रांगोळी पुरवण्यात येणार आहे. भाविकांना साजूक तुपातील अडीच हजार किलोचा शिरा प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष किरण नकाते यांनी केले आहे.

मुस्लिम बांधवांची सेवा

कोल्हापूरच्या पुरोगामी वारसा व हिंदू मुस्लिम ऐकायचे परंपरा जपत बाबासाहेब कासिम मुल्ला यांनी रथोत्सवासाठी अनोखी सेवा २५ वर्षे अखंड सुरू ठेवली आहे. अंबाबाई आणि शिवछत्रपती ताराराणी यांच्या रथोत्सवा यांच्याकडून दरवर्षी पुष्पवृष्टी केली जाते. बालगोपाल मंडळ परिसरातील भोसले प्लाझा इमारतीवरून मुल्ला हे पुष्पवृष्टी करतात. आज वयाच्या ७५ वर्षात ही सेवा त्यांनी कायम सुरू केली आहे.

वाहतूक मार्गात बदल

अंबाबाईचा रथ रविवारी नगरप्रदर्शनासाठी बाहेर पडणार आहे. मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. या मार्गावर वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. दुपारच्या नंतर या मार्गावरून जाणारी वाहने पर्यायी मार्गाने वाळवण्यात येणार असल्याचे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार गोरे यांनी सांगितले

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here